‘करू या देशाटन’च्या गेल्या काही भागांत आपण विदर्भसौंदर्य पाहत आहोत. आजच्या भागात फेरफटका मारू या नागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी आणि आसपासच्या काही पर्यटनस्थळांवर...
................
पूर्व विदर्भात इसवी सन ५०० ते १००० या काळात महापाषाणयुगीन संस्कृती होती. १९९७ साली पुरातत्त्व संशोधक डॉ. बोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात नऊ एकाश्म स्मारक शिळा शोधल्या आहे. या शिळा म्हणजे सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचा पुरावा होय.
अशोकसिंह ठाकूर यांनी केलेल्या संशोधनाची माहिती प्रफुल्ल मुक्कावार यांनी ‘दी बेटर इंडिया’ संकेतस्थळावर दिली आहे. ठाकूर यांनी चंद्रपूर व गडचिरोली येथील अनेक पुरातत्त्वीय ठिकाणांची सुंदर माहिती संकलित केली असून, उत्खननही केले आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक डॉ. कांती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात अनेक ठिकाणी उत्खनन करून पुरातत्त्वीय ठिकाणांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना डॉ. गुरुदास शेटे, डॉ. रेश्मा सावंत यांनी साहाय्य केले.
हिरापूर : हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात असून, येथे मेगालिथिक स्ट्रक्चर (डोलमेन) सापडली आहेत. मेगालिथिक म्हणजे मोठ्या शिळेपासून तासून केलेली आणि सिमेंट, माती किंवा चुना यांपैकी कशाचाही वापर न करता केलेली बांधकामे. अशा प्रकारची बांधकामे पाषाणयुगात केली जात होती. त्यात मुख्यत्वेकरून स्मारकसदृश रचना आहे. हे ठिकाण चंद्रपूरपासून उत्तरेला ७२ किलोमीटरवर आहे.
डोंगरगाव : चंद्रपूरच्याच नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे इ. स. पूर्व ५०० ते १०००च्या काळातील बृहदाश्मयुगीन संस्कृतीच्या ३३ एकाश्म स्मारकांचा शोध लावला असल्याचा दावा अमित भगत यांनी केला आहे. डोंगरगाव (बुद्रुक) येथे आढळलेल्या ३३ एकाश्म स्मारकांमुळे केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील अशा शिलास्तंभांची संख्या वाढली नसून, आता हे महाराष्ट्रातील बहुधा सर्वाधिक एकाश्म स्मारके असणारे स्थळ झाले आहे. भगत यांनी शोधून काढलेली एकाश्म स्मारके भिन्न प्रकारची आहेत. त्यांची उंची ०.५ मीटर ते ३.२५ मीटरपर्यंत असून, रुंदी ५५ सेंटिमीटर ते १६० सेंटिमीटरपर्यंत आहे. यात दोन मनुष्याकृती असणारे शिलास्तंभही आहेत. किमान सहा शिलास्तंभ जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आहेत.
टिपागड : गडचिरोली-राजनांदगाव या आंतरराज्य महामार्गावर सावरगावच्या उत्तरेस कोटगूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्याहाकल गावाच्या पायथ्याशी टिपागड आहे. टिपागड म्हणजे सुमारे एक हजार फूट उंचीची टेकडी असून, गडावर चढण्यासाठी सुमारे एक हजार फूट उंच चालत जावे लागते़. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी चांगले आहे. टेकडीवर गर्द वनराई आहे. सागवान, बिजा, हिरडा, बेहडा, बांबू असे नानाविध प्रकारचे वृक्ष तेथे आढळतात. विशेष म्हणजे, तिथे एक विस्तीर्ण तलाव आहे. हा तलाव खोल असून, या तलावात भर उन्हाळ्यातही भरपूर पाणी असते.
घोराझरी/घोडाझरी : घोडाझरी अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रस्तावित अभयारण्य आहे. हे अभयारण्य ब्रह्मपुरी वन विभागात येते. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५९.५८३ चौरस किलोमीटर आहे. या क्षेत्रात सात बहिणी पहाड, मुक्ताई देवस्थान व धबधबा समाविष्ट असेल. या अभयारण्यात नागभीड, तालोधी आणि चिमूर यातील वनक्षेत्राचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने हे क्षेत्र अभयारण्य म्हणून जाहीर करण्यासाठी मान्यता दिली आहे. या परिसरात सध्या वाघ, बिबट्या, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, माकड, ससा इत्यादी वन्य प्राणी आहेत.
नागभीड : हे ठिकाण पूर्वी टसर सिल्कसाठी प्रसिद्ध होते. या रेशमाची युरोपातही निर्यात होत असे, असे ब्रिटिश काळातील नोंदींवरून दिसून येते. हे पुरातत्त्व विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असून, तेथे १० हजार वर्षांपूर्वी मानवी वस्ती होती. अश्मयुगातील गुंफा व चित्रे तेथे सापडली आहेत.
माणिकगड : माणिकगड नावाचा किल्ला रायगड जिल्ह्यात पेणजवळही आहे; पण आपण आता ज्याची माहिती घेत आहोत हा किल्ला विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याच्या नैर्ऋत्य बाजूला राजुरा तालुक्यात आहे. या तालुक्यामध्ये माणिकगडाचा वनदुर्ग आहे. येथे नागवंशीय राजा पहिला कुरुम प्रहोद याचे राज्य होते. माना जमातीमधील नागवंशीय राजा महिंदु याने माणिकगड किल्ला नवव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे. याचे राज्य नऊ ते १२व्या शतकापर्यंत टिकले. पुढे हा प्रदेश गौंड राजाच्या आधिपत्याखाली आला. या माना जमातीच्या नाग राजाची अग्रदेवता माणिक्य देवी आहे. हिच्या नावावरूनच या किल्ल्याला माणिकगड नाव दिले गेले असावे. पुढे माणिक्यगडाचा अपभ्रंश होऊन माणिकगड असे त्याचे नाव झाले.
नागपूर-वारंगळ या रस्त्यावरील राजुराच्या पुढे साधारण २० ते २५ किलोमीटर अंतरावर चांदूर गाव आहे. चांदूर औद्योगिकीकरणामुळे चांगलेच प्रसिद्धीला आले आहे. चंद्रपूरपासून तास-दीड तासात आपण वाहनाने चांदूरपर्यंत पोहोचू शकतो. चांदूर गावाच्या दक्षिणेला १२ किलोमीटर अंतरावर माणिकगड हा वनदुर्ग झाडीमध्ये विसावलेला आहे. घनदाट जंगलामुळे माणिकगड लांबून ओळखता येत नाही. चांदूरपासून जिवतीकडे एक गाडीरस्ता जातो. या रस्त्यावर माणिकगड आहे. माणिकगड सिमेंट कारखाना याच परिसरामध्ये आहे. या कारखान्यासाठी येणारा कच्चा माल रोप-वेच्या ट्रॉलीजमधून येत असतो. माणिकगड किल्ल्याकडे जाताना रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या या ट्रॉलीज आपले लक्ष वेधून घेतात. वनखात्याने दारावर लावलेल्या वाघाच्या चित्राने त्याच्या अस्तित्वाची सूचना आपल्याला मिळते. या दरवाज्यावर सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. वरच्या बाजूला असलेले किल्ल्याचे भग्नावशेष पाहिल्यावर गतवैभवाची साक्ष पटते. गडाचे दरवाजे, त्यावरील नागाची, तसेच व्याळाची शिल्पे, तोफ, तटबंदी, बुरुज, बुरुजावरील मूर्ती, तळघर, खोल विहीर, वाड्याचे अवशेष येथे पाहण्यास मिळतात. हा किल्ला जंगलाने वेढला गेला असल्याने शत्रूच्या लक्षात येणार नाही अशी याची रचना आहे. माणिकगडाच्या पूर्व बाजूला आधी पूर्ण तटबंदी होती व त्यात जागोजाग बुरुज होते. ते आता ढासळलेले आहेत, तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. हा किल्ला पाहण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल हा सर्वोत्तम कालावधी आहे.
देवटाक : हे ठिकाण गडचिरोलीमधील ब्रह्मपुरी तालुक्यात नागभीडपासून सहा किलोमीटरवर आहे. तेथे दोन हजार वर्षांपूर्वीचे अवशेष, तसेच बौद्धकालीन शिलालेख सापडले आहेत. त्यातील एक शिलालेख नागपूर येथील म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. हे शिलालेख हिरालाल यांनी शोधून काढले असून, ते वाकाटक राजवटीतील असावेत, असे मानले जाते. जवळच असलेल्या पनोरी गावातही असे अवशेष पाहायला मिळतात. देवाची वस्ती असा देवटाकचा अर्थ आहे.
वैरागड : सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैरागडचा किल्ला आहे. हा पूर्वीच्या महाभारत व रामायणातील दंडकारण्याचाच एक भाग. स्थानिक लोकांच्या मते येथे विराट राजा राज्य करीत होता व विराटनगर ते हेच. अगदी सातारा जिल्ह्यातील वाई हे तीर्थक्षेत्रही विराटनगर म्हणून ओळखले जाते; पण महाभारतात उल्लेख केलेले विराटनगर हे नेपाळमधील विराटनगर असावे. द्वापार युगात येथे वैराचन राजा होऊन गेला व त्याच्या नावावरून त्याच्या राजधानीचे नाव ‘वैरागड’ पडले असावे, असा दुसरा समजही आहे. इसवी सनाच्या १५व्या शतकात येथे हिऱ्याची खाण सुरू होती. हिऱ्याच्या खाणीस संस्कृतमध्ये ‘वैरागर’, ‘वज्राकर’ अशी नावे आहेत. त्यावरूनच या स्थळाला ‘वैरागर’ हे नाव पडले असावे व वैरागड हे काळाच्या ओघात झालेले ‘वैरागर’चे अपभ्रष्ट रूप असावे, असाही अर्थ काढला जातो.
नवव्या शतकात वैरागड येथे नागवंशीय माना जमातीच्या राजांनी सत्ता स्थापन केल्याचा उल्लेख चांदा जिल्ह्याच्या ‘सेटलमेंट रिपोर्ट १८६९’मध्ये आहे. इ. स. १४५०पर्यंत हा भाग नागवंशीय माना राजांच्या ताब्यात होता. त्यानंतर हा प्रदेश गोंड राजाच्या ताब्यात आला. बहामनी सुलतान महंमदशहा तिसरा याने सन १४७१मध्ये आपला सरदार युसूफ आदिलखान याला वैरागडवर स्वारी करण्यास पाठविले. त्या वेळी वैरागड येथे हिऱ्याची खाण सुरू होती. ही खाण काबीज करण्याच्या इराद्यानेच ही चढाई करण्यात आली. त्याला किल्ला सर करण्यासाठी सहा महिनेपर्यंत झुंज द्यावी लागली. यात किल्ल्याची बरीच पडझड झाली होती. या किल्ल्याचे जतन करणे आवश्यक असून, पुरातत्त्व खात्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
पवनी/पौनी : हे वैनगंगेच्या काठावर वसलेले ऐतिहासिक, तसेच धार्मिक ठिकाण भंडारा जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी ही बौद्धनगरी होती. पवन राजा येथे राज्य करीत असे. त्यावरून पवनी हे नाव रूढ झाले. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच गावात प्रवेश होतो. गाव तीन बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे, तर एका बाजूला नदी आहे. वैनगंगेवर अनेक ठिकाणी घाट बांधलेले आहेत. सुमारे १५० मंदिरे येथे असून, मंदिरांचे गाव म्हणूनच हे गाव ओळखले जाते.
गंगनाथ मंदिर व पंचमुखी गणपती मंदिर टेकडीवर असून, निसर्गरम्य आहे. नागपूर विद्यापीठाकडून १९६९मध्ये जगन्नाथ मंदिराच्या आसपास उत्खनन करण्यात आले. त्या वेळी सम्राट अशोकाच्या आधी असलेल्या शुंग राजवटीतील मोठ्या स्तूपाचा शोध या ठिकाणी लागला. तेथूनच ५०० मीटरवर दुसरा स्तूप मिळाला. तेथूनच तीन किलोमीटर अंतरावर सिंदपुरी येथे संघरत्न माणके यांच्या प्रयत्नातून नवीन मोठा स्तूप नव्याने उभा राहिला असून, तो जपानी पद्धतीचा आहे. दहा हजार चौरस फुटांवर हा १२० फूट उंचीचा स्तूप उभारण्यात आला असून, १८ फूट उंचीची बुद्धाची मूर्ती वाराणसीजवळील चुनरगड येथून आणलेल्या पत्थरांतून घडवून बसविण्यात आली आहे.
चंद्रपूर हे जिल्ह्याचे शहर गाडीमार्गाने उत्तम प्रकारे जोडलेले असून दिल्ली-चेन्नई या रेल्वेमार्गावर आहे. चंद्रपूर येथे राहण्याची उत्तम सोय आहे. ताडोबा, नागभीड या ठिकाणी वन खात्याची विश्रामगृहे आहेत. जवळचा विमानताळ नागपूर येथे म्हणजेच १५३ किलोमीटरवर आहे. पुणे येथून आठवड्यातून एकदा पुणे काझीपेठ रेल्वे चंद्रपूरमार्गे जाते. वर्धा येथूनही चंद्रपूरला जाण्यासाठी रेल्वे व बस उपलब्ध आहेत.
(पुढच्या भागात पाहू कालिदासाचे रामटेक व ऑरेंज सिटी नागपूर.)
- माधव विद्वांसई-मेल : vidwansmadhav91@gmail.com
(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
(नागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी आणि आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)